विराट कोहलीला भारतरत्न पुरस्कार द्या : सुरेश रैना   

बंगळुरु : विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि २०११ चा वर्ल्ड कप विजेता संघाचा खेळाडू सुरेश रैना म्हणाला आहे की, भारत सरकारने कोहलीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे.कोहलीने २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो भारतासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. त्याने एकूण १२३ कसोटी सामन्यांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९०३० धावा केल्या. ज्यामध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश होता. जिओहॉटस्टारवर बोलताना रैना म्हणाले की, भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल कोहलीला भारतरत्न देण्यात यावा. आतापर्यंत सचिन तेंडुलकर हा एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
कोहलीला भारत सरकारने अनेक पुरस्कार दिले आहेत. कोहलीला २०१३ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर, २०१८ मध्ये भारतातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराने कोहलीला सन्मानित करण्यात आले.आता रैनाला आशा आहे की, गेल्या दीड दशकात भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या सेवेबद्दल सरकार कोहलीला भारतरत्न देईल. गेल्या दीड दशकात कोहलीने क्रिकेट क्षेत्रात अनेक विक्रम रचले आहेत.
 
कोहलीने सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा विक्रम मोडला आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला.तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणारा कोहली दुसरा खेळाडू आहे. त्याने एकूण ८२ शतके ठोकली आहेत. यासह, तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. कोहलीच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत.

Related Articles